मुंबई : वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गाचे बांधकाम आणि सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे बांधकाम, ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलाचे बांधकाम आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बांधकामास मंजूरी देण्यात आली. एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिलेत.
वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग
वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन)वर्सोवा नाना-नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम
ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आलीय. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्ग
खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरचा 'केबल स्टेड' पूल पर्यटकांसाठी आकर्षक ठरणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेचीसुद्धा बचत होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours