मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी दिल्लीत सर्व पक्षांची ईव्हीएमच्या मुद्यावर बैठक बोलवल होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशिन यांच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. याच बैठकीत महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया निवडणुक आयोगाला कळवली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया आणि व्हीव्हीपॅट, ईव्हीएम मशीन संदर्भात सूचना कळवल्या आहेत. हेच पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ही लिहीलंय. ईव्हीएम मशीन चे अनेक फेरफार उघड झाल्यामुळे राज ठाकरे यांनीही बॅलट पेपरनेच मतदान घ्यावं ही भूमिका पत्राद्वारे मांडलीय.
भाजप निवडणुका जिंकत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेतलाय. भाजप ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार करत असल्याचा संशय विरोधी पक्षांनी व्यक्त केला होता. तर आयोगानं या मशिन्समध्ये फेरफार करून दाखवा असं आवाहन राजकीय पक्षांना दिलं होतं. मात्र त्यांना ते आव्हान स्वीकारता आलं नाही. मात्र तरीही त्यांचा संशय कायम राहिला आहे.
या मुद्यावरून शिवसेना आणि मनसेची एकच भूमिका आहे. मतदान हे व्हीव्हीपॅट व्दारे न घेता मतपत्रिकेव्दारेच घ्यावी अशी मागणी मनसेची आहे. शिवसेनेचीही हीच भूमिका असल्याने या मागणीला पाठिंबा द्यावा असं आव्हान मनसेने केलेय. निमित्त मतपत्रिकेचं असलं तरी या मुद्यावरून दोनही पक्ष भाजप विरोधात एकत्र येणार का याची आता चर्चा सुरू होणार आहे. दोघांचाही शत्रू क्रमांक एक हा भाजप असल्याने महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण उभं राहू शकते का याचीही चर्चा सुरू होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours