नागपूर: राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर दिवाळखोरीत निघालेल्या नागपुरातील एका व्यापाऱ्यानं गांधीसागर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नरेश तोलानी असे ५१ वर्षीय या व्यापाऱ्याचं नाव आहे. प्लास्टिक बंदीमुळं व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे, असं सांगितलं जातं.
गेल्या तीस वर्षांपासून तोलानी हे प्लास्टिक पिशवी विक्रीचा व्यवसाय करत होते. कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांकडून पिशव्या खरेदी करून त्या दुकानांमध्ये ते विकत होते. प्लास्टिक बंदीमुळं त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. आर्थिक चणचणीमुळं ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते, असं सांगण्यात येतंय. आत्महत्या करण्यापूर्वी तोलानी यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ती गांधीसागर तलावाजवळ सापडली. 'प्लास्टिक बंदीमुळं त्रासलो आहे. माझ्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे,' असं त्यात लिहिलं होतं. प्लास्टिक बंदीमुळं तोलानींना नैराश्य आलं होतं.
२९ जुलैच्या रात्रीही ते त्रस्त असल्याचे जाणवले. पहाटे साडेचारच्या सुमारास जाग आली तेव्हा ते घरात नव्हते. त्यानंतर सगळीकडे त्यांचा शोध घेतला,' असं सांगताना पत्नी दिव्या यांना रडू कोसळलं. मुलगा सुमितनं तोलानी यांचा सगळीकडं शोध घेतला. काही वेळानंतर तो गांधीसागर तलावाकडे गेला. तलावात उडी मारताना एका व्यक्तीला पाहिल्याचं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एकानं सुमितला सांगितलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर तोलानी यांचा मृतदेह आढळून आला. गणेशपेठ पोलिस अधीक तपास करीत असल्याचे पीएसआय अमित आत्राम यांनी सांगीतले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours