सातारा, 24 सप्टेंबर : मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वराला शपथ घेऊन होणार असल्याची माहिती मराठा पक्षाचे संयोजक सुरेशराव पाटील यांनी दिली. तसंच आमच्या या पक्षाला उदयनराजे भोसले यांचा आशिर्वाद आहेच, त्यांनी नेतृत्त्व केलं तर त्यांचं आम्ही स्वागत करू अशी इच्छाही बोलून दाखवलीये.
मराठा पक्षाचे संयोजक सुरेशराव पाटील यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या पक्षाबद्दलच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.
आंदोलनांनंतर आम्ही सर्वांनी मराठा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरात सर्वांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पाडव्याला शुभमुहुर्तावर रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची शपथ घेणार आहोत. यावेळी पक्षाचे नाव, झेंडा आणि धोरण निश्चित करण्यात येतील अशी माहिती पाटील यांनी दिली.
तसंच या (कराड) मतदारसंघामध्ये आम्ही असं ठरवलंय की, शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले हे कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना आमचा जाहीर पाठिंबा राहणार आहे. राज्यातील तमाम कार्यकर्ते आणि साताऱ्यातील सर्व कार्यकर्ते आमच्यासह आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी तयार आहोत अशी घोषणाही पाटील यांनी केली.
कदाचित आमच्या पक्षाची चांगली चलती झाली तर त्यांनी आमच्या पक्षाचे चिन्ह घेतले तर ते आमच्यासाठी चांगले असून आम्ही त्यांचं स्वागत करू अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
याआधी पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक झाली होती. उदयनराजे यांनीच ही बैठक बोलावली होती. आम्ही त्यावेळी उदयनराजेंनी मराठा समाजाच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी तुम्ही पक्ष स्थापन करावा माझा तुम्हाला पाठिंबा आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही राज्यभरात पक्षासाठी तयारी करतोय असंही त्यांनी सांगितलं.
तसंच गेल्या 25 वर्षांत सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करतोय अशी माहिती पाटील यांनी दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours