नवी दिल्ली: राफेल घोटाळ्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मोदींनी सेनेवर सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण केलं असा आरोप राहुल गांधी यांनी मोदींवर केला आहे. राफेल करार हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून राफेल घोटाळ्यावर मोदी गप्प का? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
एवढा मोठा घोटाळा झाला. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर एवढी मोठी टीका करण्यात आली पण तरी देखील मोदी गप्प का असं राहुल गांधी म्हणाले आहेत. या सगळ्या घोटाळ्यामध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमणही खोटं बोलल्या असंही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान वादग्रस्त राफेल कराराबाबत फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्राँस्वा ओलांद यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राफेल करार होताना भागीदार म्हणून भारतीय कंपनी निवडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं. या करारादरम्यान, भारत सरकारनेच आम्हाला भागीदार कंपनीची शिफारस केली होती, आणि आम्हाला ते ऐकावं लागलं, असं ओलांद एका मुलाखती दरम्यान म्हणालेत. त्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधी केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ओलांद यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आता काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवलीय.
राफेल प्रकरण चिघळलं, काय म्हणाले होते ओलांद ?
भारतीय औद्योगिक भागीदार निवडण्यात फ्रान्स सरकारची कोणतीही भूमिका नाही. कोणत्या भारतीय कंपनीशी करार करावा ते भारत सरकारनं सुचवलं आणि या कंपनीच्या अध्यक्षांशी दसॉ कंपनीनं वाटाघाटी केल्या. फ्रेंच कंपन्यांना भागीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यावर भारत सरकारचं शिक्कामोर्तब गरजेचं असतं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours