मुंबई: भाजपचे अध्यक्ष अमित शहा मंगळवारी सायंकाळी अचानक मुंबईला आल्यानं राजकीय चर्चेला उधान आलंय. मंत्रिमंडळ विस्तार आणि गोव्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. मुंबईत आल्यानंतर शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेली अनेक महिने चर्चा सुरू होती. आणि गोव्यातही नेतृत्वबलाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळं लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
या आधी सोमवारी नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महामंत्री रामलाल यांच्यात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्रिमंडळात फेरबदल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबतही खलबतं सुरू असल्याचं कळतंय.
जमीन गैरव्यवहाराबाबत झालेल्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं. खडसे हे पक्षनेतृत्वाबदल नाराज असल्याचंही चित्र आहे. मंत्रिपद सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सातत्याने राज्य सरकारच्या विविध निर्णयांतील उणीवा दाखवत सरकारला घरचा आहेर दिला.
त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर खडसेंची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, या बैठकीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही उहापोह झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे फेरबदलात शिवसेनेच्याही वाट्याला काही मंत्रिपदं येतात का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours