मुंबई, 16 ऑक्टोबर : राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये तापमान वाढ झाल्याने 15 दिवसांत धरणांतील पाणीसाठा दोन टक्क्यांनी घटला आहे. गावखेड्यांत टँकरची संख्याही 50 ने वाढून 380 पर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील या दुष्काळी परिस्थितीची पाहणी पालकमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. ते मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा वृत्तांत सांगतील. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस दुष्काळाबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर 31 जिल्ह्य़ांतील 179 तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी काही दिवसांत पीक उत्पादन, भूजल पातळी, पाणीसाठे, पावसाची अभाव यासारख्या निकषांवर गावांतील परिस्थितीची पडताळणी करणार आहेत. त्यांच्या अहवालाच्या आधारे ऑक्टोबरच्या अखेरीस दुष्काळाबाबत निर्णय जाहीर होईल.
विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पावसाअभावी राज्यातील अनेक भागांत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.
मान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा
शेतकरी पेरणी करतो तो हवामान विभागाच्या अंदाजावर पण हा अंदाजच चुकला तर? दरवर्षी या अंदाजावर विनोदही होतात. यावर्षी मान्सून विभागाचा अंदाज चुकला आणि आम्हाला नुकसान सोसावं लागलं असा आरोप करत नागपूरच्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि हवामान खात्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मान्सूनच्या दुसऱ्या टप्पात पावसामध्ये मोठा खंड पडल्याने राज्यातील खरीपाचे पीक 20 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसात खंड पडल्यान खरीप अडचणीत आला असतांनाच आता नोहेंबर पासून सुरु होणारा रब्बीही हंगामालाही कमी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यातच हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने नाराज शेतकरी आंदोलन करताहेत तर काही शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात पोहोचून हवामान खात्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर दरवर्षी मुबलक उत्पादन घेणाऱ्या नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील या धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अत्यल्प पाणी मिळाले.
घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा -उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या जनतेला घरपोच दारू नकोय तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावलंय. ऑनलाईन दारू हे आपल्या संस्कृतीत नाही. पण राज्याची 'शोभा' करणारा प्रयोग रोजच सुरू असून. दुष्काळग्रस्तं भागात तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. दुष्काळ ग्रस्तांना मदतीच्या रांगेत उभं करून मारू नका. त्यांना घरपोच मदत करा. अशी मागणीही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक काढून केलीय
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours