बारामती, 9 एप्रिल : बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या निमित्त राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकलाय. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील हे शेतकरी वाटतात का? असा सवाल करत शेतकरी म्हणून तुमची ओळख होते का? असा टोला अजित पवार यांनी लगावला.
बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले, मला पाहिजे तसा प्रचार या मतदारसंघात अजून सुरू झालेला नाही. तुम्ही नगरपरिषदेच्या वार्डामध्ये जसे उभे राहता. तेव्हा कसा प्रचार करता? तसा प्रचार सुरू झाला पाहिजे. असा गर्भीत इशारा देत ते म्हणाले, ते मला काही सांगू नका. तुम्हाला वाटत असेल अजित पवार मावळात, शिरूरला,सातारला गेलाय. मात्र माझे लक्ष इथे असून मला सगळ कळतं. बिरोबाच्या देवळात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोणी हार घातला हे देखील सांगायला अजित पवार विसरले नाहीत.
2014 च्या निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य कमी झालं होतं. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. तिथून विक्रमी मतांनी पवार विजयी होतात. मात्र बदलत्या राजकारणामुळे हे मताधिक्य कमी होऊ नये याची राष्ट्रवादीला चिंता आहे. त्यामुळे अजित पवार बारामतीकडे खास लक्ष देत आहेत. तर राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी भाजपनेही जोर लावलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours