मुंबई, 21 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून धक्कातंत्रांचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. भाजप जवळपास 25 विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच भाजप आमदारांची धाकधूक वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने राज्यात सर्व्हे केला आहे. स्थानिक राजकारण, जनसंपर्काचा अभाव, सरकारच्या कामांची अंमलबजावणी न करणं या विविध निकषांवर 25 आमदारांचं तिकीट कापलं जाणार आहे. या यादीत आता नेमका कुणाचा नंबर लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभेतही दिला होता धक्का
लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून केंद्रातील सत्ता टिकवण्याचं भाजपसमोर आव्हान होतं. या निवडणुकीत काँग्रेसनेही चांगलीच कंबर कसली होती. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात प्रभावी कामगिरी नसणाऱ्या तब्बल 8 खासदारांचं तिकीट कापलं. लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेली ही खेळी यशस्वी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजप लोकसभेतील याच पॅटर्नचा आधार घेणार असल्याची माहिती आहे.
युतीबाबत काय आहे भाजपचा सर्व्हे?
लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.
विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे. पण तरीही सध्यातरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुतीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर मित्रपक्ष अशी महायुती झाल्यास तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या मित्रपक्षांसह लढल्यास महायुतीला 229 जागा मिळतील, असं भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याचं भाजपच्या एका मंत्र्यांचं म्हणणं आहे. भाजपच्या मंत्र्याच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे तर निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र या आकड्यांच्या साहाय्याने विरोधकांचं मनोबल खच्ची करण्याचा पुरेपूर प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून होईल, असं चित्र आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours