मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपकडून जाहिररित्या अनेकदा युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पण होणारा मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा? यावरून मात्र दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच वरचढीची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मीच येणार असल्याचा दावा केलेला असताना, दुसरीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचा वारंवार उल्लेख शिवसैनिकांकडून केला जात आहे.
या सर्व चर्चादरम्यानच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? यावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. पण याचवेळेस त्यांनी भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगरमधील गोल मैदानात आठवले यांनी सोमवारी (9 सप्टेंबर)जाहिर सभा घेतली. त्यावेळेस ते बोलत होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours