मुंबई, 28 ऑक्टोबर: राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा युतीच्या हातात सत्ता दिली. निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी जो दावा केला होता तो काही निकालात दिसला नाही. आता निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात नेमका सत्तेचा वाटा कसा असावा यावरून जुंपली आहे. पण जे दोन पक्ष पुढील पाच वर्ष राज्यात सरकार चालवणार आहेत. त्यांना राज्यातील निम्म्या जिल्ह्यात एकही आमदार निवडूण आणता आला नाही. महायुतीमधील सर्वात मोठे पक्ष असलेल्या भाजपला तीन तर शिवसेनेला 13 जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. अर्थात ही अवस्था फक्त सत्ताधाऱ्यांची नाही तर विरोधकांना देखील अशीच काहीशी अवस्था आहे.
निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाची चर्चा झाली. पण पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला 11 जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. यात मुंबई शहर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, नांदेड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने यंदा 54 जागा मिळवल्या आहेत. अशीच अवस्था काँग्रेसची देखील आहे. काँग्रेसला ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, गडचिरोली आणि अकोला या 12 जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही.
विधानसभेत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या. या जागा 2014च्या तुलनेत 17ने कमी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते असेलल्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमधून एकही जागा निवडूण आणता आली नाही. भाजप पाठोपाठ 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने मुंबईत दमदार यश मिळवले असेल तरी पुणे, अमरावती, अकोला, जालना, बीड, गडचिरोली, वर्धा,लातूर, नागपूर, नंदूरबार, सोलापूर जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आहेत आणि गेल्या निवडणुकीत त्यांचे 6 आमदार होते. अशा ठिकाणी यावेळी शिवसेनेचा केवळ एकच आमदार विजयी झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours