यवतमाळ, 19 मे : राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये इतर शहरांमध्ये अडकलेले मजूर अद्यापही पायी प्रवास करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पायी घरी जाणाऱ्या अनेक मजूरांचा अपघातामध्ये जीव गेला असताना यवतमाळमध्ये एसची बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांना त्यांच्या गावाला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला मागून धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसमधील 3 प्रवासी जागीच ठार झाले तर 22 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी जवळील कोळवन गावाजवळ हा अपघात झाला आहे.
सोलापूर इथून मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळ इथल्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, सोमवारी धुळ्यामध्येही भीषण अपघात झाला. नागपूर - सुरत महामार्गावरील मुकटी शिवारातील भिरडाने फाट्याजवळ ट्रॅव्हल्स आणि गॅस टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती लागली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours