मुंबई, 15 जून : देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून लोकल पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय लोकल आजपासून (15 जून) धावणार आहेत. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू होणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर 146 उपनगरीय फेऱ्या धावणार आहेत. त्या चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावर धावतील. बहुतांश लोकल या जलद मार्गाने चालविण्यात येतील. सकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सरासरी 15 मिनिटांनी लोकल सेवा सुरू असेल.

बहुतांश लोकल या चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणार आहे. या लोकल चर्चगेट ते बोरीवली दरम्यान जलद तर त्यापुढे धीम्या गतीने धावतील. तर विरार ते डहाणू या मार्गावर 16 लोकल धावतील. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन अशा 200 फेऱ्या सुरू होणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या मार्गांवर 130 लोकल फेऱ्या होतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर 70 फेऱ्या होतील. कार्यालयीन वेळांप्रमाणे सकाळी 7, 9, दुपारी 3 सायंकाळी 6, रात्री 9, 11 याप्रमाणे गाड्या चालविण्यात येतील.

अत्यावश्यक सेवेतील सुमारे 1.25 लाख कर्मचारी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. मात्र सर्वसामान्य प्रवासी या लोकलने प्रवास करू शकणार नाहीत. या रेल्वे प्रवासासाठी तिकीट काऊंटवर आधी ओळखपत्र दाखवावे लागेल, त्यानंतरच तिकीट दिलं जाईल. रेल्वे आणि राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करीत आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours