मुंबई: गावोगावचा पाहुणचार घेऊन बाप्पा त्यांच्या गावी मार्गस्थ झाले आहेत. काल रात्रीपर्यंत जवळपास सर्व गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. लालबागच्या राजाचं विसर्जन काही क्षणापूर्वी झालं. तराफ्यावरची हायड्रॉलिक ट्रॉली अलगदपणे समुद्रात उतरवली गेली आणि राजानं निरोप घेतला. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर या हे सांगण्यासाठी गिरगाव चौपाटीवर उसळला भक्तांचा विराट महासागर होता.

जवळपास 15-16 तासांहून अधिक वेळ झाला लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही मिरवणूक सुरू आहे. शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आपण पाहू शकतो. कित्येक तास राजाच्या मागे उभे राहून आणि शेकडो भक्तांचा जनसागर घेऊन ही मिरवणूक हळू-हळू पुढे सरकतेय.

तर तिकडे पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाचच्या सुमारास विसर्जन पार पडलं. यंदा दरवर्षीपेक्षा ही मिरवणूक काही तास लवकर संपली.

दरवर्षी मिरवणुकांमध्ये होणारा डीजे आणि डॉल्बीचा वापर आणि त्यामुळे मिरवणुकांना होणारा उशीर हे ठरलेलं समीकरण होतं. मात्र यंदा मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीचा वापर न केल्यानं बाप्पाची मिरवणुक लवकर पुढे सरकली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours