नागपूर : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सेवाग्राम, वर्धा इथं आपल्या कार्यकारणी समितीची बैठक आयोजित करण्याच्या विचारात काँग्रेस आहे. मात्र या बैठकीसाठी जागा देण्यासाठी सेवाग्राम आश्रमाने असमर्थता दर्शवली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला जागा देण्यास सेवाग्राम आश्रम व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे काँग्रेसला आता एक तर पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागेल किंवा बैठकीचा बेत रद्द करावा लागेल. आश्रमाच्या मागील भागातील (नई तालिम)जागा देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दर्शवली. मात्र, तेथे बैठक घेण्यास काँग्रेस इच्छुक नसल्याचं सांगण्यात येतंय.
निवडणुकांच्या तोंडावर जनसंपर्क वाढवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर मोर्चाचं देखील आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण या जागेच्या प्रश्नामुळे आता पुढे काय होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महात्मा गांधी 1936 मध्ये नागपूरच्या जवळ असलेल्या सेवाग्राम इथे राहत होते. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधून काँग्रेस या ठिकाणी बैठक घेणार आहे. या मॅरेथॉन बैठकीनंतर काँग्रेस शांततेत मोर्चा काढणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
गांधींच्या जयंती दिवशी आम्ही एक बैठक आयोजित करण्याचा विचार करत आहोत. सेवाग्रामधून काढलेला हा मोर्चा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नेण्यात येईल असं कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे.
यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील या बैठकीत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस लोकांपर्यंत पोहचण्याचा आणि निधी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours