अमृतसर: उत्तर भारतात दसरा शुक्रवारी साजरा झाला. जल्लोषात रावण दहन सुरू असताना अमृतसरवासियांसाठी शुक्रवारची रात्र काळरात्र ठरली. ज्या मैदानावर जल्लोष होता, फटाक्यांची आतषबाजी होती त्या मैदानाचं रूपांतर स्मशानात झालं. सर्वत्र आक्रोश पसरला, लोकांच्या किंकाळ्या, जीवाच्या आकांताने पळणारे लोक असं ह्रदय पिळवटून टाकणारं ते दृष्य होतं.
अमृतसरजवळच्या चौरा बाजार इथं दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम होतो आणि हजारो लोक तो कार्यक्रम पाहण्यासाठी येत असतात. तिथलं खास आकर्षण असतं ते फटाक्यांची आतषबाजी. यावहीवर्षी हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. हा कार्यक्रम ज्या मैदानावर होतो त्याच मैदानाजवळ रेल्वे ट्रॅक आहे.
मैदान गर्दीनं खच्चून भरलेलं होतं. पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळं लोक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून कार्यक्रम पाहू लागले. रावण दहन सुरू झालं. फटाक्यांची आतषबाजीही सुरू झाली. जळत्या रावण्याच्या पुतळ्याचा काही भाग खाली कोसळला. लोकांची धावपळ सुरू झाली. त्यात फटाक्यांच्या आवाजामुळं काय होतंय हे कुणालाच कळलं नाही.
त्याच दरम्यान पठाणकोटहून अमृतसरला येणारी ट्रेन (ट्रेन नं.74943 ) भरधाव वेगानं आली. ट्रेनचा वेग प्रचंड असल्यानं लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाली नाही. भरधाव ट्रेन लोकांना चिरडत पुढं गेली आणि मैदानाचं रूपांतर स्मशानात झालं.
सगळीकडे लोकांच्या किंकाळ्या ऐकू जात होत्या. लोक सैरावैरा पळत होते. जखमींचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. काही वेळात पोलीस आणि अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केलं. पण तेव्हा वाचवायला काहीच शिल्लक नव्हतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours