औरंगाबाद: दैवत बदलणारे तुम्ही आहात, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही आहात, जामिनावर आले मात्र जमिनीवर आले नाहीत अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. आज औरंगाबादमध्ये त्यांनी पदाधिकारी मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारसह राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीत नागरिकांशी संवाद साधला. पण मोदी यांच्याशी संवाद साधणाऱ्या नागरिकांना अधिकारी खोटं बोलण्याचं ट्रेनिंग देतात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

"उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार, त्यासाठी शुभेच्छा आहेत मात्र शिवसेनेचा देव बाळासाहेब आहे. महापालिकेत त्यांची सत्ता असताना बाळासाहेबांच्या स्मारकावर जास्त लक्ष द्यावं" असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला होता.

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत उद्धव ठाकरेंनी जशास तसे उत्तर दिले. दैवत बदलणारे तुम्ही आहात, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही आहात, जामिनावर आले मात्र जमिनीवर आले नाहीत असा टोला उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना लगावला.

तसंच राज्यात दुष्काळ पडलाय. ठिकठिकाणी धरणं कोरडी पडलीत. अजित पवारांना धरणाजवळ फिरकू देऊ नका, धरणे सोडा, घरातील पिंप भरा अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली.

राज्य सरकारने ३६ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली. पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झालाच नाही. मग एवढा आकडा आला कुठून ? असा सवाल उपस्थितीत कर याचा शोध घेणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी सरकारच्या विरोधात नाही मात्र मी जनतेच्या बाजूने बोलतो. मी सरकारला बांधील नाही. सरकार काम करत असेल तर वा वा आणि नाही करत असेल तर चालते व्हा सांगेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours