मुंबई, ०८ नोव्हेंबर २०१८- ऐन दिवाळीत मुंबई विमानतळावरील एअर इंडियाचे ग्राऊंड स्टाफ कर्मचारी संपावर गेले आहेत. दिवाळीचा बोनस न दिल्यानं ग्राऊंड स्फाटनं संपाचं हत्यार उपसलं. बुधवारी रात्रीपासून सुमारे ५०० कर्मचारी संपावर गेले. कर्मचाऱ्यांच्या या अचानक संपाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहेत. आज सकाळपासून संपामुळं चेक इन, सामान विमानात ठेवणं इत्यादी गोष्टींनी उशीर होत आहे. त्यामुळेच एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणाला उशिर होत आहे. संपाचा फटका पूर्णपणे प्रवाशांना होत आहे.
संपात सामील झालेले कर्मचारी हे अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे कर्मचारी आहेत. संपावर गेलेले कर्मचारी हे कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. अनेक वर्ष कंत्राटी तत्वावर काम करूनही त्यांना नियमित कर्मचारी करून घेण्यात आले नाही. तसेच नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांचे पगार फार कमी आहेत. हे कमी की काय नियमित कर्मचारी निवृत्त झाल्यावर तिथे कंत्राटी कर्मचाऱ्याचा विचार न करता नवीन कर्मचाऱ्याची भरती करण्यात येते. या सर्वाचा विरोध म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित नोकरीत घेणे, कामाच्या वेळा ठरवून देणे, पगार वाढवणे अशा मागण्या संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. मात्र या सर्व प्रकाराबद्दल एअर इंडियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तांत्रिक अडचणींमुळे विमानांच्या उड्डाणाला उशीर होत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours