औरंगाबाद: जिल्ह्यातल्या सावखेडगंगा शिवारातील विहिरीत सापडलेल्या दोन मुलांच्या खुनाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. पत्नीशी भांडणं झाल्यामुळे रागाच्या भरात जन्मदात्यानेच आपल्याच मुलांचा खून केला, असल्याचं उघड झालं आहे. 

वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथील बापूसाहेब कल्याण पवार यांच्या विहिरीत शनिवारी 29 डिसेंबर रोजी दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुलं वैजापूर तालुक्यातील नसल्याचं पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीनं तपासाची चक्रे फिरवली. 

मुलांच्या शर्टावरील प्लेग्रुप जेऊर या नावावरुन ही मुलं त्या शाळेतील आहेत का? याचा तपास घेण्यात आला. त्या दोन मुलांना निष्ठूर बापानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून ठार मारल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. 

ही दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील रहिवासी असून त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (3) आणि गणेश संतोष वाळुंजे (5) अशी आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे.

आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडणं होती. त्यामुळे आरोपी संतोष याने रागाच्या भरात मुलांना सोबत घेऊन शुक्रवारी बाहेर पडला. त्या नंतर त्याने दोन्ही चिमुकल्यांना विहिरीत फेकले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours