मुंबई, 6 सप्टेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांची गुरुवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी केली. नितीन सरदेसाई हे तब्बल 6 तास ईडी कार्यालयात होते. ईडीने त्यांना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवले होते. नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी आणखी बोलवण्याची शक्यता आहे. कोहिनूर मिलमध्ये नऊ भागीदार होते. त्यात मातोश्री बिल्डरचे 10 टक्के हिस्सा होता. या सर्व बाबी लक्षात घेता नितीन सरदेसाई यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, कोहिनूर मिलप्रकरणी यापूर्वी राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेश जोशी तसेच मनसे नेते आदित्य शिरोडकर यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

राज ठाकरे यांची ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. साडेआठ तासांहून अधिक काळ ही चौकशी चालली होती. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करताना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना 20 कोटींचा फायदा कसा झाला, असा प्रश्न ईडीला पडला आहे. राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तरीही त्यांना 2008 मध्ये 20 कोटींचा फायदा झाला, असा आरोप आहे.

राज ठाकरे यांनी मातोश्री रियल्टर्स कंपनी स्थापन केल्यानंतर सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतलं होतं. याशिवाय कंपनीला अतिरिक्त एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही मिळाली होती. ही मदतुद्धा कशी मिळाली असा प्रश्न सक्तवसुली संचलनालयाला पडला असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. मातोश्री रियल्टर्समध्ये राज ठाकरे यांचे 25 टक्के शेअर्स होते. याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरू असून पुन्हा आवश्यकता भासल्यास राज ठाकरे यांना चौकशीला बोलावण्यात येईल असंही ईडीने म्हटलं आहे.

कोहिनूर सीटीएनएल कंपनी कोहिनूर स्क्वेअरचं बांधकाम करत आहे. यातील आयएल अँड एफएसने त्यांची भागिदारी विकल्यानं कंपनीला 135 कोटींचं नुकसान झालं. त्याचवेळी राज ठाकरेंनी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारी 80 कोटी रुपयांमध्ये विकली. जमीनींचे दर वाढल्यानं आम्हाला फायदा झाला असं राज ठाकरेंनी म्हटल्याचं समजते. यामधून राज ठाकरेंना 20 कोटी रुपयांचा फायदा झाला. उरलेली रक्कम त्यांनी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारांना दिल्याची माहिती आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours