मुंबई 16 मे: राज्यात शुक्रवारपासून घरपोच मद्यविक्रीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेपासून या विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर अशा कोरोनाबाधित जिल्ह्यात मात्र या विक्रीची परवानगी नाहीये. खरं तर घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी गुरूवारपासून सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार होती. परंतु क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळविणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे इत्यादी प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं.
त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी एक दिवस लांबणीवर पडली. कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने 22 मार्च 2020 पासून देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मात्र 4 मे 2020 पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्याच दिवसात या उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला अशीही माहिती दिली जातेय.
परंतु काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन न झाल्याचं दिसून आलं होतं. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.  घरपोच मद्यसेवा ही सोय ज्या जिल्हयात मद्यविक्री सुरु आहे त्या जिल्हयात आणि संबधित जिल्हाधिकारी यांनी मद्यविक्री करीता ज्या वेळा, दिवस आणि क्षेत्र निर्धारित केलेले आहे त्यातच ही विक्री होऊ शकणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours