मुंबई, 21 मे : भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत हा आकडा 1 लाखांवर गेला आहे. मात्र भारतात कोरोनाबाधितांची संख्या जास्त असली तरी मृत्यूदर कमी आहे. भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळं भारतात येत्या काही महिन्यात कोरोनाची प्रकरणं कमी झालेली पाहायला मिळू शकतात. यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (IIPS) शास्त्रज्ञांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केल्यास भारतात नोव्हेंबरअखेरपर्यंत कोरोना रुग्ण शून्यापर्यंत पोहचतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी, हा दर कमी आहे. लॉकडाऊन-3नंतर कोरोनाच्या प्रसाराचा संख्याशास्त्रीय पद्दतीनं आढावा घेण्यात आला. त्यानुसार कोरोनाचा संशयित, बाधित रुग्ण आणि निरोगी यांच्या आकड्यांच्या आधारे एक कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या आधारे एक सिध्दांत मांडला. यावरून संशोधकांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. तीन संशोधकांनी हा पहिल्या दोन टप्प्यातील लॉकडाऊनच्या आधारे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात या राज्यांसाठी हा अहवाल सादर केला.
दरम्यान सकाळ या वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, हे संशोधन 1 जानेवारी ते 5 मे पर्यंतच्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार करणअयात आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर कदाचित पुढील अंदाजासाठी संशोधन करण्यात येईल.
कोरोनाचा प्रसार दर घटला
संशोधकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा प्रसार दर घटला आहे. तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर पहिल्या 2 लॉकडाऊनमध्ये 0.363 असा होता. आता हा दर 9 पटीनं वाढला आहे. लॉकडाऊनमधील कोरोनाचा झालेला प्रसार लक्षात घेतल्यास, ही आकडेवारी ऑगस्ट 2020 पर्यंत वाढेल आणि त्यानंतर कमी होईल. लॉकडाऊन कायम ठेवल्यास नोव्हेंबरपर्यंत हा आकडा शून्यापर्यंत जाऊ शकतो. दरम्यान देशातील इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये प्रसाराचा दर अधिक आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours