सांगली : येत्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णाकाठच्या लोकप्रतिनिधींना बोलवून वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यंदा पुराची शक्यता नाही, मात्र तरीही प्रशासन सज्ज आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व तयारी करण्यात आली आहे, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपुर्व तयारी आणि कोरोना आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. याबैठकीनंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत कर्नाटक राज्याशी आतापासूनच बोलणी सुरु करण्यात येणार असल्याचंही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

सांगली जिल्ह्यात गतवर्षी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना 'यंदा महापूराची शक्यता नाही मात्र तरीही प्रशासन सज्ज झालेला आहे. गतवर्षी आलेला महापूर लक्षात घेता राज्य सरकारकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहेत. प्रशासन पातळीवर योग्य त्या नियोजनाबाबत सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकराज्यातल्या पाण्याच्या नियोजनाबाबत कर्नाटक राज्याशी ही बोलणी सुरु करण्यात येणार आहे, त्याच बरोबर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या बाबतीतही नियोजन आणि त्यादृष्टीने बोलणी सुरु करण्यात येणार आहेत.' , असं जयंत पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours