रांची : देशातल्या गरिबांना आरोग्य सेवा देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ या योजनेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. ‘आयुष्मान भारत’ ही जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून त्यामुळं 10 कोटी परिवारांना म्हणजेच अंदाजे 50 कोटी या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेनुसार वर्षात 5 लाखांचा कॅशलेस आरोग्य विमा मिळणार आहे. झारखंडची राजधानी रांची इथं या योजनेची सुरूवात झाली. या योजनेमुळं गरिबांनाही आता उत्तम आरोग्य सेवा मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काही जणांना या योजनेच्या हेल्थ ई कार्डचही वाटपही केलं. पंतप्रधान म्हणाले, इतिहासातली ही सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. श्रीमंतांप्रमाणेच आता गरिबांनाही उत्तम आरोग्यसेवा या योजनेमुळं मिळणार आहेत. या योजनेत लाभ मिळणाऱ्यांची संख्या ही युरोपातल्या सर्व देशांपेक्षा आणि अमेरिका आणि मेक्सिकोच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
या योजनेमुळं देशातल्या आरोग्य सेवेचं चित्रही पालटून जाणार आहे. आत्तापर्यंत गरिबांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी झगडावं लागत होतं. आता गरिबांची ही परवड होणार नसून त्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. त्याबरोबर ही योजना कॅशलेस असल्याने उपचार करताना पैसे द्यावे लागणार नाहीत.
लोकांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांना यो योजनेची मदत घेण्याची गरजच पडू नये, पण जर गरज लागली तर काळजीचंही कारण नाही. 'आयुष्यमान भारत' ही योजना तुमच्यासोबत आहे असंही पंतप्रधान म्हणाले.
Post A Comment:
0 comments so far,add yours