मुंबई: सर्व मतभेद विसरून एकदिलानं भाजपविरूद्ध लढण्याची भाषा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. असं असताना मुंबई काँगेसला लागलेलं भांडणांच ग्रहण सुटण्याची दिसत नाहीत. संजय निरूपम यांचं वर्चस्व वाढत असल्याने त्यांच्याविरूद्ध पक्षातले इतर सर्व गट एकत्र आले आहेत. निरूपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची नियुक्ती करावी अशी मागणी या गटांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केलीय. तर राहुल गांधी यांचा विश्वास असेपर्यंत मी अध्यक्षपदावर राहिन असं निरूपम यांनी स्पष्ट केल्यानं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. मुरली देवरा, गुरूदास कामत यांना मानणारे गट, एकनाथ गायकवाड, कुपाशंकर सिंग, प्रिया दत्त, संजय निरूपम अशा अनेक गटात मुंबई काँग्रेस विभागाली आहे. एकेकाळी ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचं मुंबई काँग्रेसवर एकहाती वर्चस्व होतं. देवरा यांनी तब्बल 22 वर्ष मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास आणि उद्योगपतींशी असलेली जवळीक यामुळं त्यांना कुणी हात लावू शकलं नाही.

1981 ते 2003 असं दोन दशकांपेक्षा जास्त काळ ते या पदावर होते. काँग्रेसला रसदपुरवढा मुंबईतूनच होत असल्याने देवरांचं महत्व कायम राहिलं. नंतर गुरूदास कामत यांच्याकडे पक्षानं मुंबई काँग्रेसची धुरा दिली. त्यावेळी देवरा यांच्या समर्थकांनी कामत यांच्याविरूद्ध आघाडी पुकारली.

नंतर कृपाशंकर सिंग यांच्याकडे धुरा आली. पक्षांतर्गत राजकारणापेक्षा भ्रष्टाचाराचे आणि इतर आरोपांमुळेच कृपाशंकर सिंग यांना जावं लागलं. जर्नादन चांदुरकर हे फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. नंतर फायरब्रॅण्ड नेते संजय निरूपम यांच्याकडे राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सोपवली.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले निरूपम हे कधीच पक्षात एकरूप होऊ शकले नाहीत आणि इतर नेत्यांनीही त्यांना कधी आपलसं केलं नाही. याला कारण निरूपम यांची कार्यशैली असल्याचंही बोललं जात. राहुल गांधींचा विश्वास ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतलय. निरूपम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं, आंदोलनं केलीत मात्र त्यांची प्रतिमा सर्वसमावेशक कधीच झाली नाही.

केवळ उत्तर भारतीयांचे नेते याच भूमिकेतून त्यांच्याकडे कायम पाहिलं गेलं. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम उत्तर भारतीय नेत्यांची वर्णी लावली जाते हा काँग्रेसवर कायम आरोप केला जातो. त्याचं कारण म्हणजे मुंबईत असलेली उत्तर भारतीय मतदारांची संख्या हेच आहे.

त्यामुळं आपली लॉबी आणखी घट्ट करण्याचा संजय निरूपम यांचा कायम प्रयत्न असतो. त्यामुळेच त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी इतर सर्व गट मतभेद विसरून एकत्र आले आहेत. काहीही केलं तरी इतर नेते आपल्याला स्वीकारणार नाहीत याची जाणीव संजय निरूपम यांना आहे.

असं असताना त्यांचं मनपरिवर्तन करण्यापेक्षा आपला गट मजबूत करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळेच त्यांच्यावर एकाधिकारशाही आणि मनमानी करण्याचे आरोप होताहेत. सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका, भाजप, शिवसेनेचं मुंबईत असलेलं मोठं आव्हान असं असताना मुंबई काँग्रेस मात्र भांडणात गुंतलेली आहे. मुंबई काँग्रेसचं हे भांडण भाजप आणि शिवसेनेच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours