मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संध्याकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महत्वाचे मंत्री आणि नेते उपस्थित होते. मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेसोबतची भूमिका, लोकसभा निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत तयारी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेली काही महिने सुरू आहे. मात्र तो नेमका कधी होणार हे मुख्यमंत्र्यांशीवाय कुणालाही माहित नाही. भाजपच्या कोट्यातून चार जागा असल्यानं अनेक इच्छुकांनी कंबर कसलीय तर कुणाला बाहेर जावं लागेल या चिंतेनं अनेकांचा घोर वाढलाय.
मुख्यमंत्र्यानी सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणं सुरू केलं असून त्याचे अहवालही तयार केले आहेत. त्यामुळं अनेकांची चिंता वाढलीय. शिवसेनेकडून सातत्यानं हल्लाबोत असल्यानं युतीचं काय हा सध्याचा कळीचा मुद्दा बनलाय. भाजप कुठलीही जोखीम घेऊ इच्छित नाही. 2014 सारखी परिस्थिती सध्या नाही याची भाजपला जाणीव आहे.
त्यामुळं मुख्यमंत्र्यांसहीत भाजपचे महत्वाचे नेते युती व्हावी अशी वक्तव्य करताहेत तर शिवसेना अजूनही युतीसाठी तयार नाही. त्यातच 25 तारखेपासून उद्धव ठाकरेंचा अयोद्धा दौरा सुरू होणार आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली असंही बोललं जातंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours