मुंबई, 02 जुलै: गेल्या 4 दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या तिन्ही लोकल सेवा बंद पडली आहे. गेली 3 दिवस उशीरा धावणाऱ्या लोकल आज बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई परिसरात आणखी 2 दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाचा जोर आणि लोकल सेवा बंद पडल्यामुळे राज्य सरकारने मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना तसेच शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे बंद
मध्य रेल्वेची वाहतूक पाहटेपासून बंद झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ठाणे ते मुंबई लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रुळावर पाणी साचल्यामुळे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या हर्बर मार्गावरील सेवा देखील विस्कळीत झाली आहे. नवी मुंबईत देखील सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकल सेवेला पावसाने ब्रेक लावला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours